Sign In now, Let's start your Grocery Shopping. Don't have an account? Sign Up Now
Come join the Green Life! Let's set up your Account.
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म त्यांच्या आजोळी कोल्हापूर संस्थानातील कुंभोज गावी २२ सप्टेंबर १८८७ रोजी झाला. ते ऐतवडे बुद्रुक येथील पाटील घराण्यातील होते. हे घराणे धार्मिक प्रवृत्तीचे व सुसंकृत होते. त्यांचे दोघे पूर्वज दिंगबर जैन मुनी बनले होते. भाऊराव परंपरागत अर्थाने धार्मिक नसले तरी धर्माचे मर्म ते जानीत होते. मानवधर्म त्यांनी आचरणात आणला आणि इतरांना शिकविला.
भाऊरावांची राहणी अत्यंत साधी होती. खादीचे धोतर व नेहरू शर्ट हा त्यांचा वेष. सुरुवातीला खांद्यावर घोंगडी असे. नंतरच्या काळात ती गेली आणि हातात काठी आली. झुणका-भाकर आणि ताक कण्या हे त्यांचे नेहमीचे जेवण.
साधी राहणी, सार्वजनिक कार्याची आवड आणि कष्ट करून मालावर नंदनवन फुलविण्याची जिद्द त्यांनी स्वत:चे पणजोबा देवगौंडा यांचेपासून घेतली. स्वाभिमानाचा, करारी बाण्याचा आणि सेवाभावी वृतीचा वारसा त्यांना वडील पायगौंडा यांचेपासून मिळाला. कणखर शरीरयष्टी, सत्यनिष्ठा व अलौकिक धैर्य यांचा लाभ त्यांना मातोश्री गंगाबाई यांच्यापासून झाला.
भाऊरावांचे प्राथमिक शिक्षण सुरुवातील आजोळी कुंभोज येथे झाले. कुंभोज सुटल्यानंतर वडिलांच्या सतत होणा-या बदल्यामुळे त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची हेळसांड झाली. दहिवडी, विटे इत्यादी ठिकाणी शाळेच्या पटावर त्यांचे नाव असे. पण शाळेचा व त्यांचा फारसा संबंध आला नाही. हूडपणा व बंडखोरी यांतच त्यांचा वेळ जात असे. समवयस्काचे ते नेते होते.
विटे येथे पाणी भरण्यास अस्पृश्यांना बंदी होती. हा अन्याय सहन न होऊन भाऊरावांनी रहाट मोडून विहिरीत टाकला. विद्यार्थीदशेपासूनच ते अन्याय व विषमता यांविरुद्ध दंड थोपटून उभे राहिले.
सन १९०२ ते १९०९ या कालावधीत भाऊराव हायस्कूल शिक्षणासाठी कोल्हापूर येथे होते. ते जैन बोर्डिंगमध्ये राहून राजाराम हायस्कूलमध्ये शिक्षण घेऊ लागले.
अस्पृश्य मुलांच्यासाठी निघालेल्या "मिस क्लार्क होस्टेल" च्या समारंभात हजर राहिल्याबद्दल पुन्हा आंघोळ करण्याचा जैन बोर्डिंगच्या सुपरिटेडेचा आदेश पाळण्याचे भाऊरावांनी नाकारल्यामुळे त्यांनी जैन बोर्डिंगमधून हकालपट्टी झाली. त्यानंतर ते राजवाड्यावर जाऊन राहिले.
राजवाड्यावर राहण्यास मिळाल्यामुळे भाऊरावांना छत्रपती शाहू महाराज यांचा सहवास लाभला. महाराजांचे विचार व कार्य यांचा खोल ठसा भाऊरावांच्या मनावर उमटला. त्यांची दुष्टी अधिक विशाल झाली. दलित व उपेक्षित समाजाबद्दल त्यांना अधिक करुणा वाटू लागली. त्यांच्या हक्कासाठी व उद्वारासाठी झगडण्याचे विचार भाऊरावांच्या मनात घोळू लागले.
सन १९०७ मध्ये इस्लामपूर येथे एक विद्यार्थी वर्गाबाहेर बसून शिकत असलेला भाऊरावांना दिसला. चौकशी केल्यानंतर तो अस्पृश्य असल्याचे सांगण्यात आले. त्यांचे नाव ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप. त्याला भाऊरावांनी आपल्या घरी नेले व स्वत:च्या पंक्तीला बसवून जेवू घातले. त्याबद्दल त्यांनी आईचा मारही खाल्ला. ज्ञानदेव कोल्हापूर येथील मिस क्लार्क होस्टेलमध्ये भाऊरावांनी प्रवेश मिळवून दिला. त्याच्या शिक्षणासाठी मदतही दिली. स्वत:च्या विद्यार्थीदशेपासूनच भाऊरावांनी दलितांच्या व उपेक्षितांच्या शिक्षणाचे कार्य हाती घेतले.
भाऊरावाची अभ्यासात फारशी गती नव्हती. श्री.भार्गवराव कुलकर्णी या त्यांच्या वर्गशिक्षकांनी त्यांना इंग्रजी सहाव्या इयत्तेतून मॅट्रीकमध्ये न चढविल्यामुळे भाऊरावांनी महाराजांकडे वशिला लावला. कर्तव्यकठोर भार्गवरावांनी आपला निर्णय बदलण्याचे नाकारले. या कर्तव्यनिष्ठ शिक्षकांबद्दल भाऊरावांच्या मनात निर्माण झालेला आदर आयुष्यभर त्यांच्या उदगारातून स्पष्ट होत असे.
कष्टाळू, धाडशी व प्रामाणिक भाऊरावांना मुंबई येथील जव्हेरी शेठ माणिकचंद पानचंद यांनी मोती पारखण्याची कला शिकविण्याचा प्रयत्न केला. भाऊरावांना त्यात रस वाटेना. निर्जिव मोती पारखण्यापेक्षा सजीव मोत्यांची पारख करण्यासाठी भाऊरावांचा जन्म झाला होता. बेकार भाऊरावांची त्यांच्या पत्नीदेखत त्यांच्या वडिलांनी कानउघाडणी केल्यामुळे त्यांनी गृहत्याग केला व ते सातारा येथे खाजगी शिकवण्या करू लागले. 'पाटील मास्तर' म्हणून ते प्रसिद्धीस आले.
सन १९०९ मध्ये दुधगाव येथे ग्रामस्थांच्या मदतीने भाऊरावांनी 'दुधगाव विद्यार्थी आश्रम' सुरु केला. हा शैक्षणिक प्रयोग चांगलाच यशस्वी झाला.
सन १९१३-१४ च्या सुमारास भाऊरावांनी कोरेगाव येथील शेतक-यांना संघटीत करून त्यांची सहकारी संघटना स्थापन केली होती. शेतक-यांच्या हिताकडे भाऊरावांचे सतत लक्ष असे.
भाऊरावांनी काही काळ विमा एजंट म्हणून काम केले. त्या काळात धनिकांचे मोठ्या रकमेचे विमे त्यांनी शैक्षणिक संस्थाच्या नावाने करून द्यायला लावले.
सन १९१४ मध्ये कोल्हापूर येथील डांबर प्रकरणात श्री.लठ्ठे यांचेविरुद्ध खोटी साक्ष द्यायचे भाऊरावांनी नाकारल्यामुळे त्यांच्यावर खोटे आरोप ठेऊन त्यांना तुरुंगात डांबले. त्यांचा अनन्वित छळ केला. छळास कंटाळून त्यांनी तुरुंगात तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. छळास कंटाळून त्यांनी तुरुंगात तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यातूनही ते जगले. त्यांचे हातून पुढे महान कार्य व्हायचे होते. भाऊराव निर्दोष सुटले. शेवटी सत्याचा विजय झाला.
सन १९१४ ते १९१६ या कालावधीत भाऊरावांनी ओगले ग्लास वर्क्सचे व १९१६ ते १९२१ या कालावधीत किर्लोस्कर ब्रदर्स यांच्या लोंखडी कारखान्याचे पहिले विक्रेते प्रतिनिधी म्हणून यशस्वी काम केले. कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासंबंधी दोन योजना त्यांनी किर्लोस्कर कारखान्याच्या मालकवर्गास सुचविल्या होत्या. त्यांनी त्यापैकी एकही योजना स्वीकारली नाही. त्यामुळे भाऊरावांनी राजीनामा दिला. सन १९२२ मध्ये त्यांनी धनजीशा कुपर यांच्या सहकार्याने सातारा रोड येथे नवा लोंखडी कारखाना उभा केला. कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी नफ्यातील काही हिस्सा खर्च करण्याचे दिलेले आश्वासन कूपरनी न पाळल्यामुळे भाऊराव याही कारखान्यातून सन १९२४ मध्ये बाहेर पडले. कामगारांचे हित व त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे प्रयत्न यांचा त्यांनी सतत पाठपुरावा केला. यानंतर त्यांनी स्वत:ला पूर्ण वेळ शिक्षणकार्यालाच वाहून घेण्याचे ठरविले.
भाऊराव यांच्यापुढे महात्मा फुले यांचा आदर्श होता. त्यांनी फुल्यांचे कार्यच पुढे चालविले. त्यांनी सत्यशोधक समाजाच्या चळवळीत सक्रीय भाग घेतला व प्रभावी कार्य केले. आपल्या ओजस्वी वकृत्वत्वाने भाऊरावांनी ग्रामीण महाराष्ट्र हलवून सोडला. प्रचारासाठी त्यांनी तमाशा व जलसे यांतहि भाग घेतला. अडचणीच्या प्रसंगी त्यांनी ढोलकेही वाजविले.
समाजप्रबोधनाची अशी एकही संस्था, सभा, परिषद, चळवळ किंवा व्याख्यानमाला आढळणार नाही कि ज्यामध्ये भाऊरावांचे श्रम खर्ची पडले नाहीत. समाजातील विषमता व अनिष्ट रूढी यांविरुद्ध बंड पुकारणे हा त्यांचा पिंड होता. अस्पृश्यतेविरुद्ध बंड, वर्णव्यवस्थेविरुद्ध बंड, अंधश्रध्येविरुद्ध बंड, पंक्तिप्रपंचाविरुद्ध बंड, जरठकुमारी विवाहाविरुद्ध बंड, कामगारांच्या पिळवणूकीविरुद्ध बंड, सामाजिक व आर्थिक विषमतेविरुद्ध व अन्यायाविरुद्ध बंड, बंडाचा झेंडा हाती घेणे भाऊरावांचा स्थायीभाव होता.
काले, ता.कराड, जि.सातारा येथील सत्यशोधक समाजाच्या परीषदेत ता.५-९-१९१९ रोजी भाऊरावांनी बहुजनसमाजाच्या शिक्ष्नास्ठी एक शैक्षणिक संस्था स्थापन करण्यासंबंधी ठराव मांडून तो संमत करून घेतला. त्यानुसार त्यांनी लोंकाच्या सहकार्याने काले येथे ता.४-१०-१९१९ रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. या ठिकाणी संस्थेमार्फत एक वसतिगृह, एक प्राथमिक शाळा व एक रात्रशाळा काढून शैक्षणिक कार्याला प्रारंभ केला.
सन १९२४ मध्ये रयत शिक्षण संस्थेचे सातारा या जिल्ह्याच्या ठिकाणी स्थलांतर करून तेथे सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांसाठी एक मिश्र वसतिगृह सुरु केले. या वसतिगृहाचे सन १९२७ मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शुभहस्ते 'श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस' असे नामकरण झाले. सर्व जातीधर्माची मुले भावडांप्रमाणे एकत्र राहतात. एकत्र जेवतात व एकत्र काम करून स्वावलंबनाने शिक्षण घेतात हे पाहून गांधीजी म्हणाले, 'भाऊराव, साबरमती आश्रमात जे मला जमले नाही ते तुम्ही येथे यशस्वी करून दाखविले आहे. तुमच्या कार्यास माझे आशीर्वाद आहेत.' गांधीजीप्रणीत हरिजन-सेवक संघाकडून या वसतिगृहाला सन १९३३ पासून दरसाल पाचशे रुपये मदत मिळू लागली.
गांधी व आंबेडकर यांच्यामधील पुणे कराराच्या स्मृत्यर्थ भाऊरावांनी पुणे येथे सन १९३२ मध्ये युनियन बोर्डिंग हाऊस सुरु केले व बहुजनसमाजातील मुलांच्या उच्च शिक्षणाची सोय केली. वसतिगृहजीवनातून विद्यार्थ्यावर योग्य संस्कार करता येतात अस त्यांचा अनुभव होता. दलितांच्या व उपेक्षितांच्या शिक्षणासाठी त्यांनी अशी अनेक वसतिगृहे उघडली. सध्या रयत शिक्षण संस्थेमार्फत शे-पाऊणशे ठिकाणी वसतिगृहे चालवली जात आहेत.
अनाथ मुले व बालगुन्हेगार यांना जुव्हेनाईल कोर्टामार्फत खास सुधारगृहात पाठविले जाई. या मुलांना इतर मुलांच्याबरोबर सर्वसाधारण वसतिगृहात ठेवावे. वेगळे ठेवू नये. असे भाऊरावांना वाटे. आपले विचार त्यांनी राज्यशासनाला पटवून दिले. कोर्टमिटेड मुलांना त्यांनी आपल्या वसतिगृहात ठेऊन घेण्यास सुरुवात केली. मुदत संपल्यानंतरही संस्थेमार्फत त्यांचे शिक्षण पूर्ण होईल अशी व्यवस्था केली. त्यांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न केले.
श्री.छत्रपती शाहू बोर्डिंगचा खर्च भागविण्यासाठी रोख व धान्यरूपाने भाऊराव मदत गोळा करीत. सुरुवातीला काही वर्षे पुरेशी मदत मिळत नसे. बराच खर्च भाऊरावांना स्वत:करावा लागे. भाऊरावांनी सर्व पुंजी यासाठी खर्च झाल्यानंतर त्यांनी नजरपत्नी लक्ष्मीबाई यांच्या दागिन्यांकडे वळली. या माऊलीने भाऊरावांच्या अनुपस्थितीत शेवटी मंगळसूत्रही स्वत:च्या हाताने काढून दिले. पती-पत्नीच्या या अलौकिक त्यागाच्या पायावर रयत शिक्षण संस्थेची इमारत उभी आहे. आपल्या वैयक्तिक संसाराची भाऊरावांनी कधीच चिंता केली नाही. कुंटूबासाठी त्यांनी काही केले नाही, काही ठेवले नाही.
शाळेविना एकही खेडे असू नये आणि प्रशिक्षित शिक्षकाविना एकही शाळा असू नये अशी भाऊरावांची विचारसरणी होती. सातारा जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करण्याची पूर्वतयारी म्हणून त्यांना योग्य असे शिक्षक घडविणे आवश्यक होते. सन १९२१ मध्ये अंगापूर, जि.सातारा येथे भरलेल्या बहुजनसमाजाच्या प्राथमिक शिक्षकांच्या परिषदेत भाऊरावांनी सातारा येथे ट्रेनिंग कॉलेज सुरु करणार असल्याची घोषणा केली होती. या आश्वासनांची पूर्तता सन १९३५ साली झाली. त्या वर्षी रयत शिक्षण संस्था रजिस्टर केली. वटवृक्ष हे संस्थेचे बोधचिन्ह बनले. सातारा येथे 'सिल्व्हर ज्युबिली रूरल ट्रेनिंग कॉलेज' या नावाने एक ट्रेनिंग कॉलेज भाऊरावांनी सन १९३५ मध्ये सुरु केले. तेच आजचे महात्मा फुले अध्यापक विद्यालय होय. एतद्देशीय खाजगी शिक्षण संस्थेने सुरु केलेले हे राज्यातील पहिले ट्रेनिंग कॉलेज होते. स्त्री-शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी त्यांनी सन १९४२ मध्ये सातारा येथे 'जिजामाता अध्यापिका विद्यालय' सुरु केले. रयत शिक्षण संस्था सध्या आठ अध्यापक विद्यालये चालवीत आहे.
धोंडेवाडी (काले) या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेमार्फत पहिली प्राथमिक शाळा सुरु झाली होती. सन १९३६ मध्ये सातारा येथे 'रावबहादूर काळे प्रॅक्टिसिंग स्कूल' सुरु केले. ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करण्याच्या हेतूने भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत १९३८ पासून व्हाँलटरी प्राथमिक शाळा उघडण्यास सुरुवात केली. या शाळा प्रामुख्याने जिल्हाच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागात व पूर्वेकडील दुष्काळी भागात निघाल्या. या शाळांची संख्या ५७८ पर्यंत वाढली. ध्येयवादी, निष्ठावंत व त्यागी शिक्षकांच्या व ग्रामस्थांच्या सहकार्याने या शाळा चालविल्या. स्वांतत्र्यप्राप्तीनंतर प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी राज्य शासनाने स्वीकारल्यामुळे त्यांनी या व्हाँलंटरी शाळा शिक्षकांसह शासनाकडे सुपूर्द केल्या. रयत शिक्षण संस्थेमार्फत सध्या २४ प्राथमिक शाळा सुरु आहेत. व्हाँलटरी प्राथमिक शाळांचे वैशिष्टय व महत्व राज्य व केंद्र शासनाच्या लक्षात आले होते. म्हणूनच त्यांनी 'सार्वत्रिक शिक्षणाचा अभ्यास' करण्यासाठी आलेल्या ब्रह्मी शिष्टमंडळाला या कार्याची पाहणी करण्याची शिफारस केली होती.
सन १९४० मध्ये सातारा येथे भाऊरावांनी 'महाराजा सयाजीराव फ्री अँण्ड रेसिडेन्सियल हायस्कूल' सुरु केले. सर्व शिक्षण मोफत असावे अशी त्यांची धारणा होती. स्वांतत्र्यप्राप्तीपूर्वीच त्यांना हे तत्व कार्यवाहित आणले, व निवासी शिक्षणाची माहितीही त्यांनी प्रत्यक्षात दाखवून दिली. विद्यार्थ्यांना रोज शारीरिक श्रम करावे लागत. गरीब व होतकरू मुले स्वावलंबनाने शिक्षण घेऊ लागली. श्रमाची प्रतिष्ठाही वाढली.
सातारा शहराबाहेर ग्रामीण महाराष्ट्रात ठीकठिकाणी हायस्कूल्सचे उघडून भाऊरावांनी माध्यमिक शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या दारात नेले. आपल्या हयातीत त्यांनी १०१ हायस्कूलचे नियोजन केले. सध्या रयत शिक्षण संस्थेमार्फत सव्वाचारशेहून अधिक हायस्कूल्स चालविली जातात. यापैकी काही फक्त मुलींची आहेत. सुमारे शंभर विद्यालयांमध्ये उच्च माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था आहे. काहींमध्ये व्यावसायिक वा तांत्रिक शिक्षणाची सोय आहे.
सन १९४७ साली सातारा येथे भाऊरावांनी 'छत्रपती शिवाजी कॉलेज' उघडले. हे कॉलेजही मोफत व निवासी होते. गरीब विद्यार्थी स्वावलंबनाने उच्च शिक्षण घेऊ लागले. 'कमवा व शिका' योजना रुजू लागली. सन १९५४ मध्ये सैदापूर, ता.कराड येथे 'सदगुरु गाडगे महाराज कॉलेज' उघडून भाऊरावांनी उच्च शिक्षण ग्रामीण भागात नेले. सन १९५५ मध्ये सातारा येथे त्यांनी पदवीधर शिक्षकांच्यासाठी एक प्रशिक्षण महाविद्यालय उघडले. 'आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन' असे याचे नंतर नामकरण झाले. सध्या रयत शिक्षण संस्था चाळीस महाविद्यालये चालविते. त्यांपैकी एक अभियांत्रिकी महाविद्यालय, एक विधीमहाविद्यालय, व दोन प्रशिक्षण महाविद्यालये आहेत. अकरा महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शिक्षणाची सोय आहे.
बालसंगोपन व पूर्वप्राथमिक शिक्षणाचे महत्त्व भाऊराव जाणून होते, सन १९५४ मध्ये त्यांनी सातारा येथे एक बालवसतिगृह व एक बालकमंदिर सुरु केले होते. रयत शिक्षण संस्थेमार्फत संध्या अनेक ठिकाणी पूर्वप्राथमिक शिक्षणाचे वर्ग सुरु आहेत.
भाऊरावांनी स्त्री-शिक्षणाकडे, प्रौढ शिक्षणाकडे आणि व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणाकडेही लक्ष दिलेले आढळते. एकविसाव्या शतकाला सामोरे जाताना ज्या शैक्षणिक तत्वांचा पुरस्कार भारत सरकार आज करीत आहे, ती तत्वे पन्नास-साठ वर्षापूर्वीच भाऊरावांनी प्रत्यक्ष कार्यवाहीत आणली होती, यातून भाऊरावांचा द्रष्टेपणा दिसून येत नाही का ?
सन १९४८ मध्ये गांधी वधानंतरच्या काळात, राज्य शासनाचा गैरसमज झाल्यामुळे (किंवा करून दिल्यामुळे) शासनाने रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांची ग्रँट तहकूब केली होती. मंत्राच्या खुनाचा कट केल्याचा आरोप करून कर्मवीर भाऊराव पाटील आणि रयत शिक्षण संस्थेचे पाच आजीव सभासद यांच्या घरांची झडती घेण्यात आली होती. झडतीत आक्षेपार्ह असे, काही सापडले नाही. भाऊरावांनी आरोप सिद्ध करण्याचे जाहीर आव्हान दिले होते. या प्रकरणात राज्य शासनाचा निषेध करणारे व संस्थेची ग्रँट सुरु करण्याची मागणी करणारे ठराव महाराष्ट्रभर संभामधून समंत करण्यात आले. महाराष्ट्र प्रांतिक कॉग्रेस आमदारांच्या उपस्थितीत ठराव करून रयत शिक्षण संस्थेची ग्रँट सुरु करण्याची मागणी केली होती. लोकमताच्या दडपणामुळे अखेर राज्य शासनाला ग्रँट देणे भाग पडले. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातील जनतेने नैतिक पाठिंबा दिला आणि सढळ हाताने संस्थेस आर्थिक मदतही दिली. मुद्दाम निर्माण केलेल्या संकटास कर्मवीरांनी धैर्याने तोंड दिले होते. संस्था वाचली होती. इतकेच नव्हे तर या प्रकरणामुळे संस्था वाढली होती.
२७ नोव्हेंबर १९४८ रोजी सातारा जिल्हा विद्यार्थी कॉंग्रेसने कर्मवीर भाऊराव पाटील यांना एक रुपयांची थैली अर्पण करून त्यांचा सत्कार केला होता. ग्रँट बंदीच्या काळातच हे घडले. त्यानंतरच्या काळात भाऊरावांना अनेक थैल्या मिळाल्या. अनेक सन्मान घडले. सन १९५९ मध्ये राष्ट्रपतींच्याकडून 'पद्मभूषण' हा किताब मिळाला, पुणे विद्यापीठाने 'डी.लिट.' ही सन्माननीय पदवी देऊन गौरव केला. जनतेने पूर्वीच त्यांना 'कर्मवीर' ही उपाधी बहाल केली होती.
भाऊरावांनी ग्रामोन्नतीच्या हेतूने जिल्हाभर फिरून लोकजागृती केली होतीच. सन १९५३ पासून दर दोराबजी टाटा ट्रस्टच्या रूरल वेल्फेअर बोर्डाच्या सहकार्याने माण तालुक्यात ग्रामोद्वाराचे कार्य केले. देवापूर परिसरातील नऊ खेंडयाचा कायापालट घडविला.
भाऊरावांनी अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठविले होते. त्यांमध्ये चार हरिजन विद्यार्थ्यांच्या समावेश आहे. लंडन येथे संस्थेचे वसतिगृह उघडले होते. त्या वसतिगृहातही विद्यार्थी स्वावलंबनाने राहत.
लोकजागृतीसाठी, शिक्षणप्रसारासाठी आणि संस्थेला मदत गोळा करण्यासाठी भाऊराव आयुष्यभर अनवाणी पायाने व उघड्या माथ्याने उन्हापावसातून हिंडत होते. त्यांच्या प्रकृतीवर याचा परिणाम जाणवू लागला. ते वरचेवर आजारी पडू लागले. संधिवात, रक्तदाब व हदयविकार यांच्या उपचारासाठी त्यांना अनेकदा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हावे लागले होते. हॉस्पीटलमधून बाहेर पडताना मिळालेला विश्रांतीचा सल्ला त्यांनी कधीच पाळला नाही. बाहेर पडले की कार्यरत होऊन जात. सन १९५९ मध्ये उपचारासाठी ते पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाले. यापूर्वी हदयविकाराच्या अनेक झटक्यातून ते सावरले होते. डॉक्टरांच्या अपेक्षेपेक्षा किमान दहा वर्षे ते अधिक जगले होते. केवळ इच्छाशक्तीच्या बळावर. ता.९ मे १९५९ रोजी हदयविकाराचा तीव्र झटका येऊन भाऊरावांचे पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये निधन झाले. निधनसमयी त्यांच्या मृत्युशय्येजवळ त्यांचा एक हरिजन विद्यार्थी होते.
कर्मवीर भाऊराव पाटील एक झुंजार योद्धे होते. ते महाराष्ट्राचे भाग्यविधाते होते. या आधुनिक भगीरथाने शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत आणली. ज्या ध्येयासाठी ते राबले, खपले त्या ध्येयाचा सामाजिक व राष्ट्रीय वारसा आता केवळ त्यांचे विद्यार्थी, संस्थेतील सेवक, संस्थेचे हितचिंतक व कार्यकर्ते यांच्याकडेच नव्हे तर देशातील आम जनतेकडे आला आहे.
शिक्षणाचे जे कार्य शासनाने केले नव्हते, ते भाऊरावांनी केले. भाऊरावांनी स्वत:चे कार्यकर्ते घडविले होते म्हणून हे शक्य झाले. चिनी भाषेत एक म्हण आहे. 'तुम्हाला काही महिन्यांसाठी तरतूद करावयाची असेल तर धान्य पेरा, काही वर्षांसाठी तरतूद करावयाची असेल तर फळझाडे लावा आणि पिढ्यानपिढ्यासाठी तरतूद करावयाची असेल तर फळझाडे लावा आणि पिढ्यानपिढ्यासाठी तरतूद करावयाची असेल तर माणसे पेरा.' भाऊरावांनी माणसे पेरा.' भाऊरावांनी माणसे पेरली होती. सामर्थ्यवान व गुणसंपन्न अशी माणसे तयार करणे व त्यासाठी तळमळीने प्रयत्न करणे हे भाऊरावांच्या कार्याचे रहस्य आहे.
कर्मवीर भाऊराव नेहमी म्हणत, 'सर्व माणसे समान आहेत. सर्वांना समानतेची-बंधुत्वाची वागणूक दिली पाहिजे. जातीय, धार्मिक, सामाजिक व आर्थिक भेंदावर आधारित विषमतेला मुठमाती दिली पाहिजे.' सामाजिक समता व एकता हे तर भाऊरावांच्या कार्याचे प्राणच होते.
गेल्या शंभर वर्षाच्या ओजस्वी महाराष्ट्रीय परंपरेतील भाऊराव ते एक तेजस्वी पुरुष होते. त्यानी सर्व समाजसेवकांच्या कार्यावर एक प्रकारे कळसच चढविला आहे. सर्वांगीण, सर्वस्पर्शी व व्यापक कार्य करणारे भाऊराव हे महापुरुष होते. त्यांचे जीवित कार्य दीपस्तंभाप्रमाणे भावी पिढ्यांना समाज जीवनातील शाश्वत मुल्यांबाबत सदैव मार्गदर्शन करीत राहील.
- आ.भा.मगदूमअ.नु | माहिती |
१. | १८८७ जन्म कुंभोज ता.हातकणंगले जि.कोल्हापूर (२२-९-१८८७) |
२. | १९०२ राजाराम हायस्कूल व जैन बोर्डिंग प्रवेश. |
३. | १९०९ शिक्षण प्रसारक मंडळ, दुधगाव-सक्रीय सहभाग |
४. | १९१२ कुंभोज येथील श्री.आण्णा पाटील यांची सुकन्या 'आदक्का' (लक्ष्मीबाई) यांच्याशी विवाह |
५. | १९१४ किंग एडवर्ड पुतळा- डांबर प्रकरण-कोल्हापूर |
६. | १९१४ ओगले ग्लास वर्क्स, ओगलेवाडी विक्रेते प्रतिनिधी |
७. | १९१६ किर्लोस्कर कारखाना, किर्लोस्कर वाडी विक्रेते प्रतिनिधी |
८. | १९१७ चिरंजीव आप्पासाहेब यांचा जन्म |
९. | १९१९ काले, ता.कराड येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना (४-१०-१९१९) व वसतिगृह स्थापनेने शैक्षणिक कार्याचा श्रीगणेशा |
१०. | १९१९ प्रथम कन्या.चि.शंकुतला हिचा जन्म |
११. | १९२० आजन्म खादी वापराचे व्रत |
१२. | १९२१ नेर्ले ता.वाळवा येथे वसतिगृहाची स्थापना |
१३. | १९२२ मे.धनजीशा कुपर यांच्या सहकार्याने सातारा रोड येथे लोंखडी कारखान्याची स्थापना |
१४. | १९२४ सातारा रोड येथील कुपर कारखाना सोडला. |
१५. | १९२४ रयत शिक्षण संस्थेचे सातारा येथे स्थलांतर व सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांसाठी सातारा येथे मिश्र वसतिगृहाची स्थापना. |
१६. | १९२६ द्वितीय कन्या चि.बेबी हिचा जन्म. (मृत्यू सन १९२८) |
१७. | १९२७ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची भेट व छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊसचे नामकरण. (२५-२-१९२७) |
१८. | १९३० पत्नी सौ.लक्ष्मीबाई यांचे अकाली निधन (३०-३-१९३०) |
१९. | १९३२ उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी पुणे येथे युनियन बोर्डिंग हाऊस या मिश्र वसतिगृहाची स्थापना. |
२०. | १९३५ रयत शिक्षण संस्थेचे रजिस्ट्रेशन |
२१. | १९३५ राज्यातील पहिल्या एतद्देशिय खाजगी प्रायमरी ट्रेनिंग कॉलेजची सातारा येथे स्थापना. |
२२. | १९३६ सातारा येथे रा.ब.काळे प्रँक्टिसिंग स्कूलची स्थापना |
२३. | १९३८ प्राथमिक शिक्षण समितीची स्थापना व पहिली व्हाँलटरी प्राथमिक शाळा यवतेश्वर (सातारा) या खेडेगावी सुरु केली. संस्थेमार्फत ५७८ प्राथमिक शाळा चालविल्या जात होत्या. |
२४. | १९४० सातारा येथे पहिल्या मोफत व वसतिगृहयुक्त माध्यमिक शाळेची स्थापना |
२५. | १९४१ धुळे म्युनिसिपालिटी तर्फे मानपत्र प्रदान. |
२६. | १९४२ वडील श्री.पायगौंडा यांचे निधन |
२७. | १९४५ कोल्हापूर व्यापारी वर्गाकडून थैली समर्पण व गौरव |
२८. | १९४७ सातारा येथे पहिल्या मोफत व वसतिगृहयुक्त महाविद्यालयाची स्थापना. |
२९. | १९४८ सातारा जिल्हा विद्यार्थी कॉग्रेसकडून, संत गाडगे महाराज हस्ते लक्ष रु.निधी अर्पण |
३०. | १९४८ संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांकडून शेवरलेट गाडी प्रदान |
३१. | १९४९ अहमदनगर जिल्हा लोकल बोर्डातर्फे मानपत्र प्रदान. |
३२. | १९५२ किर्लोस्कर ब्रदर्स लि., किर्लोस्करवाडी-कामगारांतर्फे थैली समर्पण व गौरव केंद्रीय मंत्री ना.डी.पी.करमकर यांच्या हस्ते. |
३३. | १९५४ कराड या तालुक्याच्या ठिकाणी संत गाडगे महाराज महाविद्यालय हे ग्रामिण भागातील महाविद्यालय सुरु केले. |
३४. | १९५५ सातारा येथे आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन हे पहिले प्रशिक्षण महाविद्यालय सुरु केले. |
३५. | १९५८ उत्तर सातारा (सातारा) जिल्हा लोकल बोर्डातर्फे मानपत्र प्रदान |
३६. | १९५९ भारत सरकारकडून 'पद्मभूषण' किताब बहाल. (२६-१-१९५९) |
३७. | १९५९ पुणे विद्यापीठाकडून 'डी लिट' पदवी प्रदान. (५-४-५९) |
३८. | १९५९ अहमदनगर जिल्हा जनतेमार्फत रु.१ लक्ष निधी समर्पण. (६-५-५९) |
३९. | १९५९ 'ससून हॉस्पिटल' पुणे येथे निधन. (९-५-१९५९) |
४०. | १९५९ 'चार भिंती' (गांधी टेकडी) सातारा येथे अग्निसंस्कार (१०-५-१९५९) |
कांही माणसं नशीबवान असतात. प्रेमाचं फळ देव त्यांचा ओंजळीत टाकतो. अगदी लहानपणापासून माझ्यावर माया करणारी इतकी माणसं आमच्या घरात होती कीं ख-या वात्त्सल्याचा वर्षाव घरात आईकडून होत असूनही मी माझ्या आईच्या वाट्यास फार थोडाच येत असे. माझं बालपण माझ्या वडिलांनी सुरु केलेल्या धनीणीच्या बागेतील वसतिगृहातील मुलांच्या सान्निध्यात केंव्हा व कसे गेले ते माझे मलाही कळले नाही. आता मी ७७ वर्षांच्या आयुष्यात मागे पाहतो आहे. मला दिवसात मला घडविण्या-या माझी आई, आजी, मावशीबाई तसेच माझे मामा, मामी, बोर्डिंगमधील सवंगडी आणि धनीणीच्या बागेचा सर्व निसर्गरम्य परिसर. रहाटगाडगं लावलेल्या विहिरीत मी कितीतरी वेळा डोकावून माझच प्रतिबिंब पहात असे आणि मध्येच उडणा-या एखाद्या पक्षाचं प्रतिबिंब माझी नजर अक्षरशः खेचून घेत असे. विहिरीत डोकावून पाहण्याचा हा माझा एक छंदच होता. पुढे मला कळू लागले तरी माझा हा छंद कमी झाला नाही. उलट असे डोकावून पाहतांना मला आकाशाएवढे अण्णा दिसत आणि पक्षाच्या रुपाने वसतिगृहातील मुले आहोत असा भास होई. आईचा मायेचा हात आम्हां मुलांना आकाश ठेंगणे वाटत असे अण्णांनी वसतिगृहातील मुलांसाठी छोट्या जणू पर्णकुट्या बांधलेल्या होत्या. आम्हीं मुलं धनीणीच्या बागेतील एखाद्या झाडाखाली अगर एखाद्या पर्णकुटीत पुस्तक वाचत अगर गप्पा मारत बसलेली असत. आई जेवायला हाक मरी पण भुकेचे भानही मला होत नसे. एखाद्या मुलगा मला सांगे, "अरे जा की, वहिनी जेवायला हाक मारत आहेत"! पण मी मुलांच्या बरोबर कधी कधी वसतिगृहात जेवूनही बसलेला असे. मी आईला सांगत असे, "मला भूक नाही तू जेवून घे". मला भूक कशी लागत नाही यांचे वहिनीला नेहमी कोडे वाटत असे. माझे काका आणि माझ्या आत्या व वसतिगृहातील मुले माझ्या आईला "वहिनी"च म्हणत. त्यामुळे मी ही आईला वाहिनीच म्हणू लागलो. अण्णांनी प्रचंड शिक्षण कार्य केले. शिक्षणाचे इवलेसे रोप धनीणीच्या बागेत लावले. त्या वृक्षाचा वटवृक्ष झाला म्हणूनच माझ्या आईला त्या कार्यात सहभागी होता आले. ती मोठ्या मनाची प्रेमळ मुली होती. म्हणून अण्णाच्या कामात सहभागी होण्याची तिला प्रेरणा मिळाली. मी आणि वसतिगृहातील सर्व मुले त्या वटवृक्षावर ऐच्छिक विहार करणारे पक्षी होते. अण्णा व वहिनींच्या जीवावर आम्ही सर्व मुले अगदी सुखी होतो. आम्हांला त्यांच्या मायेच्या पंखाखाली वावरताना कसलीही काळजी नव्हती. काळजी होती आम्हा मुलांची वहिनींना व अण्णांना. अण्णा संस्थेच्या कामासाठी सदैव बाहेर असत. साहजिकच मुलांची देखभाल वहिनींनाच करावी लागत असे. पुढे पुढे वहिनींना या कामाची आवड लागली आणि त्या एकाद्या माऊली प्रमाणे आम्हा मुलांचे खाणे-पिणे, अभ्यास, आजारपण सर्व काही पाहू लागल्या.
माझी आई सोवळं-ओवळं मानत होती. पण हळूहळू तिच्या मनावरील सोवळ्या-ओवाळ्याच सावट कमी होत गेले. ही गोष्ट आम्हा वसतिगृहातील मुलांच्या दृष्टीने किती भाग्याची! वसतिगृहातील मुले आपल्या आईवडिलांना सोडून आलेली असत. त्यामुळे वहिनींना सर्व मुलांची आई होता आले. वसतिगृह पहाण्यास मोठ-मोठी मानसं येत. तेव्हा त्यांना वसतिगृहाची माहिती देण्याचे कामही वहिनी करीत. कधी कधी एखाद्याकडून सहज विचारणा होई की, "तुम्हाला मुले किती?" त्यावेळी वहिनी सांगत, "मला पन्नास मुले आहेत". वहिनींचे उत्तर ऐकूण पाहुणे मंडळी आश्चर्यचकित होत असत. माझी आई शिकलेली नव्हती पण तिचं वात्सल्याने ओथंबून भरलेले हृदय सोवळ्या-ओवळ्याच्या आवरणाखाली दडलेलं होतं. हे आवरण दूर होण्यासाठीच की काय वहिनींना अण्णांच्या सहधर्मचारिणी होण्याची संधी परमेश्वराने उपलब्ध करून दिली? असा विचार कधी कधी माझ्या मनात डोकावून जातो. मी स्वत: देवधर्म मनात नाही. पण असा विचार मनात जेंव्हा येतो तेंव्हा मी परमेश्वराच्या विचाराने अंतर्मुख होतो. मामा व काका वहिनींचे व अण्णांचे भक्त- आमचे एकत्र कुटुंब होते त्यामुळे घर सतत माणसांनी भरलेले असे. नातेवाईकांची आवक-जावक सतत चालू असे. अण्णा किर्लोस्करवाडीला किर्लोस्कारांकडे "सेल्समन" म्हणून काम करींत होते तेंव्हा माझे मामा कलगौंडा पाटील घरी वरचेवर येत जात असत. माझे चुलत काका श्री एस.ए. पाटील त्यांना आम्हीं "शिवाकाका" म्हणत असू. माझ्या मामांना आणि काकांना अण्णांना भरघोस यश आले. या दोघांनाही अण्णांनी व्हिक्टोरिया टेक्निकल स्कूलमध्ये शिकायला घातले. पुढे या दोघांनीही शिक्षणात चांगली प्रगती दाखवली. याची हकीकत अशी की-
वहिनी अण्णांना म्हणाल्या, "माझ्या भावाला शिक्षण देता तर शिवाकाकालाही शिक्षण द्या". अण्णांनी वहिनींचे ऐकले व दोघांनाही पुण्याला शिकायला ठेवले. शिवाकाकांचे आई-वडील लहानपणीच वारले होते. या दोन्ही मुलांनी भविष्यकाळात खूप नावलौकिक मिळविला. या दोघाचीही वहिनी व अण्णांवर विलक्षण भक्ती होती. कारण या दोघांचेही सर्व जीवन त्यांनी उभे केले होते. चुलत दिरावर देखील वहिनींनी स्वतःचा स्वार्थ कधीही पाहिला नाही. कुटुंबातील एक जबाबदार व्यक्ती म्हणूनच त्या वागल्या.
पुढे अण्णांच्या प्रयत्नाने मामा सोलापूरच्या ऑईल मिलमध्ये कामास लागले. सोलापूरला हिराचंद गांधी यांची ऑईल मिल होती. तेथे मामा इंजिनिअर म्हणून काम करू लागले. तेथे गुजराथी लोकांशी प्रथमपासून संबंध आल्यामुळे व्यापाराचे मुलभूत धडे मिळत गेले. त्यामुळे त्यांच्या इतका विश्वास संपादन केला की त्यांनी सोलापूरला एम.आय.डी.सी.मध्ये स्वतःचा कारखाना काढला व पुढे एम.आय.डी.सी.चे संस्थापक चेअरमन देखील झाले.
शिवाकाकांचीही औद्योगिक प्रगती झपाट्याने मार्गाला लागली होती. ते एका मोठ्या अवघड "ट्रॅgग लँड" मशीनवर काम करीत होते. त्या मशीनवर एकावेळी ३०० लोक काम करीत होते. काम अतिशय जबाबदारीचे होते. या कामांत ते स्वकर्तृत्वावर चमकले. प्रथम ते इराण, ब्रह्मदेश, रंगून बंदर येथे कामासाठी गेले. या मशीनवर काम करतांना कटिंगमध्ये केसाएवढा फरक पडला तर ३०० माणसे व ऑफिसर हे मृत्युच्या जबड्यात पडतील असे ते अवघड काम होते. परत येतो की नाही याची त्यांना शाश्वती नसे म्हणून रंगूनला जातांना त्यांनी वहिनींच्या बरोबर फोटो काढला. त्या फोटोत मी कोट-पँट व टोपी घालून वहिनींच्या उजव्या बाजूला उभा आहे. डाव्या बाजूस शकुंतला माझी बहिण उभी आहे आणि वहिनींच्या हातावर बेबी घेतली आहे. तो फोटो मी मुद्दाम जतन केलेला आहे. या फोटोचे महत्त्व म्हणजे वहिनींना त्यांत त्या जशा आहेत तशा मला पाहता येतात. शिवाकाकांनी रंगूनला जाताना बरेच फोटो काढून नेले. आपण फार जबाबदारीच्या कामावर जात असल्याची त्यांना तीव्र जाणीव झालेली होती म्हणूनच इवढे फोटो काढण्याचा त्यांनी प्रपंच केला.
मामांनी पुढे सोलापूरला स्वतःचा कारखाना काढला व स्वतःचे आईल इंजिन्स, इलेक्ट्रिक पंप्स(डिपवेल पंपस) तयार केले. त्यांचा माल पाश्चात्य देशांत जाऊ लागला. इराण, बांगला देश, पाकिस्तान इत्यादी देशांत त्यांच्या कारखान्याचा माल लोकप्रिय झाला. सोलापूर फौंड्री सुरु केली. मामांच्या कौटुंबिक परिवारही मोठा होता. त्यांना सहा मुले व तीन मुली झाल्या. त्यांची सर्व मुले डॉक्टर, इजिनिअर, पदवीधर अशी शिकलेली आहेत.
हिराचंद गांधींनी मामांना योग्य आदराने विश्वासाने वागविले. त्यांनी सोलापूरचे प्रभात टॉकीज विकावयास काढले तेव्हा पहिल्यांदा मामांनी विचारले व त्यांनाच ते विकले. मामांच्या माघारी त्यांच्या मुलांनी सोलापूरला सर्व उद्योगधंदे यशस्वीरित्या चालविले आहेत. आपल्या पहिल्या वर्कशॉपचे नाव "लक्ष्मी इंजिनीअरिंग वर्क्स" असे देऊन वहिनींची स्मृति आपल्या कार्य कर्तृत्वास सदैव चिरंतन ठेवली आहे. मामांच्या मुलांनी उद्योगधंद्यामध्ये अत्यंत परिश्रम घेतले. व उत्तम प्रकारची कार्यक्षमता दाखविली व सोलापूर जिल्ह्यातील एक आदर्श व समर्थ उद्योगपती म्हणून नाव कमविले. मामांची व शिवाकाकांची वहिनी व अण्णांच्यावर अतिशय भक्ती होती. मामांना कुंभोजहून शिकायला आणलें नसते तर वहिनींना आपल्या दिरांना (शिवाकाकांनाही) शिकविण्याची संधी मिळाली नसती. वहिनींच्या आशीर्वादाने शिवाकाकांना देखील पुढे येता आले. हा माझा भाऊ आणि हा माझा चुलत दीर असा भेदाभेद वहिनींच्या मनात नव्हता. वहिनी तशा सर्वसमावेशक होत्या. "विहिरीत नसेल तर पोह-यात कोठून येणार?" या म्हणींच्या स्वभाववृत्तीत कमालीचा सा सर्वसमावेशक भाव वसत होता. कर्मवीरांच्या सहवासात हे त्यांचे सुप्त भाव प्रत्यक्ष प्रकट झाले हेच येथे स्पष्ट होते. विहिरीत होते म्हणूनच पोह-यात आले हेच खरे.
अण्णा भावंडात सर्वांत मोठे. बाळूकाका अण्णांचे भाऊ. ते एक्साईज इन्स्पेक्टर होते. कोल्हापूरच्या आत्या द्वारकाआक्का आणि सर्वांत लहान कराडच्या ताराक्का. दोन्ही आत्या अजून आहेत. एवढे वृद्धत्त्व असूनही त्या चांगल्या तल्लख बुद्धीच्या आहेत. अण्णा व वहिनींच्या कितीतरी आठवणी अजूनही त्यांच्या अंतःकरणात ताज्या टवटवीत आहेत. मामा, शिवाकाका ही मंडळीही घरातीलच होती. त्यांच्यात कोणताही दुरावा नव्हता. असे आमच्या घरांतील एकत्र कुटुंबाचे वातावरण होते.
शिवाकाका प्रीमॅच्युअर रिटायरमेंट घेऊन द्वारकाआक्कांकडे कोल्हापूरला आले. कोल्हापुरात त्यांनी स्वतंत्र ऑईल इंजिन दुरुस्तीचा कारखाना काढला. शेतक-यांना इंजिन घेऊन शेतीला पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने सर्व कोल्हापूर जिल्हयात चळवळ उभी केली. कोल्हापूर जिल्ह्यात मोठे उद्योगपती म्हणून नावलौकिक मिळवला. सोलापूरला मामा तर त्याच काळात कोल्हापूरला शिवाकाका देखील कोल्हापूर एम.आय.डी.सी.चे संस्थापक-चेअरमन झाले. हा एक मोठा योगायोगच म्हणावा लागेल.
सन १९३८ सालापासून ते १९४३ सालापर्यंत मी शिवाकाकांच्या कडेच शिकायला राहिलो होतो. नंतर अण्णांनी माझे लग्न ठरविले व शिवकांनी कोल्हापूरला जैन बोर्डिंगात माझे फक्त रु.१००००/- खर्च करूं लग्न केले. कोल्हापूरला काकांच्या घरासमोर खूप मोठा मांडव घातला होता.
कोल्हापूरच्या श्रीमंत छत्रपती ताराबाई राणीसाहेब माझ्या लग्नात उपस्थित होत्या. त्यांच्या बरोबर आम्हां दाम्पत्याचा फोटोही काढण्यात आला. श्रीमंत छत्रपती ताराबाई राणीसाहेबांनी एक नंबरचे सरदारांना ज्या थाटात लवाजमा पुरविला जातो तसा माझ्या लग्नात लवाजमा पुरविला होता. लग्न अगदी सध्या पद्धतीने, गांधी पद्धतीने झाले. खादीचे कपडे मला व सौ. सुशीलाबाईनी साधी साडी असा आमचे लग्नाचा पेहराव होता.
श्रीमंत छत्रपती ताराबाई राणीसाहेबांनी चांदीच्या ताटात मावतील एवढे चांदीचे रुपये आहेर केला. तेव्हा अण्णा राणीसाहेबांना म्हणाले, "मी तुम्हांला काय आहेर देऊ?". तेव्हा राणीसाहेब म्हणाल्या, "तुम्ही आमच्या प्रजेची सेवा करता यापेक्षा कोणता मोठा आहेर असणार आहे!" माझा विवाह दिनांक १०/०३/१९४३ रोजी झाला त्याबाबत दिनांक १४ फेब्रुवारी १९८८ रोजी "दैनिक पुढारी" या वर्तमान पत्रामध्ये "पाहता मागे वळोनी" असा लेख प्रसिध्द केला होता तो असा-
सातारचे सुप्रसिद्ध कार्यकर्ते भाऊराव पाटील यांचे चिरंजीव आप्पासाहेब पाटील यांचा मंगल विवाह माधाचे न.चि.पाटील यांची कन्या चि.सौ.का. सुशिलाबाई हिच्याशी आज सायं.७.२४ व. येथील जैन बोर्डिंगच्या आवारात थाटाने झाला. समारंभ श्री. मन्महा. ताराबाईसाहेब, छत्रपती महाराज, मेजर सरदार पाटणकर, सर रघुनाथराव सबनीस, रा.ब.इंदुलकर, खान बाहा.साद्री शेठ कोरगावकर वगैरे मंडळी उपस्थित होती. या शुभ प्रसंगी करण्यात आलेले सर्व आहेर कर्मवीर भाऊरावांनी आपल्या जिजामाता फीमेल ट्रेनिंग स्कूलला दिले.
शेवटी भाऊरावांनी सर्वांचे आभार मानून आपले उर्वरित आयुष्य स्त्री शिक्षणाकरिता खर्ची घालणारे आहोत असा आपला निश्चय जाहीर केला" दिनांक १ जानेवारी १९८८ रोजी १९८८ रोजी "दैनिक पुढारी" वर्तमानपत्र हे ५० व्या वर्षात पदार्पण करींत आहे त्या निमित्ताने दै.पुढारीच्या लेखनकार्याचा ऐतिहासिक आढावा घेतला होता. त्यांत माझ्या विवाहाची वरील बातमी प्रसिद्ध करणेत आली होती. ती बातमी माझ्या व्याह्यांच्या वाचनात आली आणि तो अंक अजूनही माझ्या संग्रही आहे.
भविष्यात वेध घेताना भूतकाळाचा घेतलेला मागोवा हा प्रेरणादायी ठरतो यामुळे जुन्या पिढीला पुन:प्रत्ययाचा आनंद मिळतो व नव्या पिढीला इतिहासाच्या पाऊलखुणांचे दर्शन घडते. आजच्या पिढीला लग्नात व्यर्थ खर्च करावा की नको याचा विचार करावयास लावणारा असा हा प्रसंग फारच उपकारक ठरेल अशी माझी धारणा आहे. आज माझ्या लग्नाला ६० वर्षे झाली. अलिकडेच लग्नखर्च आटोक्यात आणण्याचा लोक प्रयत्न करण्याची सवय अजूनही समाजाला पटत नाही. याचेच दु:ख होते. तोच खर्च मुला-मुलींचे शिक्षणाला व्हावा असे मला वाटते.
अण्णांनी श्रीमंत छत्रपती ताराबाई महाराणी सो. यांनी दिलेल्या आहेराचे पैसे नंतर सातारा येथील जिजामाता अध्यापिका विद्यालयास दिले. शिवाकाकांनी माझे खूप लाड केले. "माझ्या मुलास तू फार लाडावले आहेस" असे अण्णा नेहमीच म्हणत. वहिनींचा मृत्यू सन १९३० मध्ये झाला आणि मी सन १९३१ व १९३२ ला शिवाकाकांचे कडून परत अण्णाचे बरोबर सातारला आलो. नंतर १९३७ पर्यंत सातारला धनीणीच्या बागेत रहात होतो. मामा आणि काकांनी माझे खूप लाड केले. मला त्यांनी आईची आठवण होऊन दिली नाही.
वहिनींना दागिन्यांची हौस व आकर्षण फारसे नव्हते. मामा आपल्या लाडक्या बहिणीला वरचेवर दागिने करींत असत. तसे मामांनी माझ्या आईला खूप दागिने केले. अण्णांनी ते संस्थेच्या कामासाठी, वसतिगृहासाठी विकले. बहीण भावांचे एकमेकांवर खूप प्रेम होते व माझ्यावरही खूप प्रेम होते. वहिनी कर्मठ घराण्यातून आल्या होत्या परंतु किर्लोस्करवाडीत रहायला आल्यावर अठरा पगड जातीच्या शेजारील बायकांशी वहिनींची ओळख झाली होती. या काळात सर्वांशी मिळून-मिसळून बोलतांना , गप्पा मारतांना त्याच्यामधील कर्मठपणा नैसर्गिकरित्या कमी झाला.
वहिनींना पोटदुखीचा आजार जडला त्यामुळे मिरजेला जाणे भाग पडले. पुरुष डॉ. वेल्स तेव्हा मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमध्ये काम करीत होते. किर्लोस्करांच्या पत्नी राधाबाई या सौ. वहिनींच्या बरोबर मिरजेस गेल्या होत्या. त्यामुळे ऑपरेशन झाले. किर्लोस्करांबरोबर मतभेद झाल्यानंतर अण्णा सर धनजी शहा कूपर यांचेकडे आले.
सातारारोड येथे अण्णा "सेल्स मॅनेजर" म्हणून काम करीत होते. कारखान्यात त्यांना भागीदारीही मिळाली होती. एका माळावर हा कारखाना होता. लोकांना राहण्यास सध्या झोपड्या बांधल्या होत्या. आम्हींही तेथेच रहात होतो. शेजारी मुसलमान समाजातील इब्राहीम सुतार, मराठा समाजातील ईश्वरा सावंत, ब्राह्मण समाजातील बंड अशा वेगवेगळ्या जातींची माणसे रहात होती. त्याच चाळीत केशवराव ठाकरे प्रबोधनकार (मा. बाळासाहेब ठाकरे यांचे वडील) रहात होते. कारखान्यातील मालाचा उठाव होण्यांसाठी व प्रचार करण्यासाठी त्यांनी एक मासिक चालविले होते. अण्णा तेथील कामगारांचे नेतृत्व करीत होते. त्यांच्या सुखसोयी पहात असत. सौ.वाहिनीही कामगारांच्या कुटुंबात जाऊन त्यांची विचारपूस करीत असत. बंड बाईंचे नुकतेच लग्न झाले होते. त्यांचे वय लहान होते. त्यांना स्वयंपाक शिकवला. संसारातील अनेक गोष्टींचे मार्गदर्शन केले. त्यांना वहिनी म्हणजे एक आधार वाटू लागला.
इब्राहिम सुतार यांची पत्नी आशाबी ही वहिनींची जिवलक मैत्रीण झाली. तिच्याएवढी जिवलग मैत्रीण वहिनींना दुसरा कोणीही नव्हती. वहिनी सातारा रोडला राहत होती. याच वास्तव्यात सौ. वहिनींचा सामाजिक दृष्टीकोन जागा झाला व त्यांच्या सोवळ्या-ओवळ्याच्या कल्पना निसर्गतःच कमी होऊ लागल्या. त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकी जाणीव आपोआपच निर्माण होऊ लागली. ईश्वरा सावंत हा बायकोला वरचेवर मारहाण करीत असे. सौ. वहिनींनी त्याला एकदा विचारले "का मारतोस?" त्यांनी सांगितले, "ही काम नीट करींत नाही. हिला स्वयंपाक येत नाही". वहिनींनी सांगितले, "तू तिला सुधारण्यांठी कांही प्रयत्न केलास का? तो म्हणाला, "नाही". परंतु त्यांनी वहिनींना विनंती केली की, "वहिनी, तुम्हीच तिला प्रपंच कसा करायचा ते शिकवा".
मी लहान असतांना श्री केशवराव ठाकरे (प्रबोधनकार मा. बाळासाहेब ठाकरे यांचे वडील) माझा अभ्यास घेत असत. त्यांनीच मला पाढे शिकविले, मला चांगले आठवते कूपर इंजिनिअरिंगचा परिसर- एका कुटुंबासारखा होता. पुढे अण्णांचे सारा धनजी शा कूपर यांच्या बरोबर मतभेद झाले. अण्णांची स्वतंत्र वृत्ती जागी झाली. नोकरीत राहून शिक्षणदानाचे काम आपणांस करता येणार नाही अशी अण्णांची मनोमन खात्री झाली. त्यांनी सातारारोड सोडण्याचा निर्णय घेतला व ते सातारला आले. तेथे सातारला आल्यावर अण्णांचा व मावशीबाईचा परिचय झाला. अण्णांनी शिक्षणासाठी सातारला आणले. मीही या वसतिगृहात रहात होतो. वसतिगृहातील मुलांना स्वयंपाक करणेसाठी त्याच पेठेत जवळच एक दुसरे घर भाड्याने घेतले होते. तेथे श्रीमती कट्टे नावाच्या बाई स्वयंपाक काम करत असत.
वहिनीही सातारला आल्या. वसतिगृहापासून जवळच भाड्याने घेतलेल्या घरात त्या राहू लागल्या. तेथे आम्ही १९२६-२७ पर्यंत रहात होतो. तेथेच महात्मा गांधींनी वसतिगृहाचे "श्री छत्रपती शाहू बोर्डिंग" असे नामकरण केले. पुढे छत्रपती शाहू महाराजांचे कारभारी सातारचे डोसाभाई माणेकजी यांच्या मध्यस्थीने धनीणीची बाग खंडाच्या लिलावात अण्णांनी मिळविली.
१९२७ साली वहिनी धनीणीच्या बागेत रहावयास आल्या. आज जे ऑफिस आहे तेथे बैलांचा गोठा होता. गोठा व्यवस्थित करून त्यातच वहिनी राहू लागल्या. बैल उघड्यावर बांधत आणि वसतिगृहाच्या मुलांच्या स्वयंपाकासाठी एक शेड बांधली. वसतिगृहात चाळीस मुले होती. धनीणी बागेत राहायला येण्याअगोदर सात-आठ महिने वहिनी सातारारोडलाच रहात असे. मी एक-दोन दिवसाने सातारारोडला जात असे. जुन्या मोटरस्टँडला बसायचे ते सातारारोडला घरासमोर उतरायचे. फक्त एक आणा भाडे होते. वहिनी मला ठेऊन घेत नसतं. "जा, शाळा बुडेल" म्हणायच्या. मी एकटाच जात असे. मला मजा वाटायची. वहिनी सातारा येथे आल्यानंतर माझे सातारा रोडला जाणे बंद झाले.
धनीणीच्या बागेतील वहिनींचे जीवन हे खरे जीवन सुरु झाले असे म्हणता येईल. वसतिगृहातील त्यावेळेची सर्वमुले शेतकरी कुटुंबातील होती. सुरुवातीला एकच बैल होता. पुढे कांही वर्षांनी दुसरा बैल विकत घेतला. मग बैलांची जोडी झाली. बागेत शेतीची कामे सुरु झाली. मोट चालत असे. मुले चालवायची पण मला चालवता येत नव्हती. फार अवघड वाटायचे.
पुढे वहिनींना त्यांने मावसभाऊ भाऊसाहेब यांना सातारला घरी आणले. त्यांना धंदेशिक्षण शाळेत घातले व पुढे व्हिक्टोरिया टेक्निकल स्कूल मध्ये घातले. दुर्दैवाने ते क्षयरोगाने वारले. घरातले कोणीतरी असावे म्हणून त्यांनी आणले होते. बागेत ते सेक्रेटरी म्हणून काम करींत.
वहिनींचे धनीणीच्या बागेतील वास्तव्य व्यवस्थित चालू होते. त्यांना कुटुंब स्वास्थ्य मिळाले. १९२८ साली बेबी झाली. ती एक-दीड वर्षांची होऊन वारली. गजेंद्रगडकर वैद्यांचे औषध चालू होते. मीच औषध आणायला जात असे. बेबीच्या मृत्यूनंतर वहिनी फारच दुःखी व अबोल झाल्या. वहिनींची रहाणी साधी होती. कारण परिस्थितीच तशी होती. अण्णांनी स्वतःचे शेअर्स विकले व किर्लोस्कर रहाटगाडगे विहिरीवर आणून बसविले. सध्या त्या विहिरीवरच ऊस,गहू, सोयाबीन, नारळ पिकवतात.
आण्णांनी त्या शेतीत छोटे छोटे प्लॉट पाडून ते विद्यर्थ्यांना पिकवायला दिले होते. मुलांनी स्वतःला लागणा-या खर्चाइतके उत्पन्न त्यातून काढावे असा नियम होता. मुले भाजीपाला, केळी तेथे लावत. खानदेशातील ठिपक्यांच्या केळीची लागवड करण्यासाठी अण्णांनी खास रामू वडार नावाच्या मुलास खानदेशात केळीची लागवड कशी करायची ते शिकायला पाठविले होते. तो शिकून तयार झाल्यावर परत आला. त्याने धनीणीच्या बागेत केळी लावल्या व इतरही मुलांना शिकवले. त्यावेळी एकेका घडाला ५५० केली आल्या होत्या. ठेका द्यावा लागे. केळीचे घड झाडाला पेलत नसत. असे नजर लागणारे केळीचे पीक येऊ लागले. १९२९ च्या कोल्हापूरच्या शेती प्रदर्शनात या घडाला पहिले बक्षीस मिळाले. लॉर्ड आयर व्ही यांचे हस्ते ते मिळाले.
अण्णांनी मुलांना शेती शिकविण्यासाठी आष्ट्याचे मल्लीशा कनवाडे यांना धनीणीच्या बागेत सहकुटुंब आणून ठेवले होते. मुले शेतीची कामे पहात, पुस्तक वाचत अभ्यास करत. एकूण तीस प्लॉट होते. मुलांचा महिना साडेतीन रुपये भोजन खर्च येत असे. मुलांनी पिकवलेला भाजीपाला स्वयंपाकांत केला जाई. दीडशे नारळांची झाडे होती. नारळाचे उत्पन्न चांगले येत असे. रोज दोन नारळ मुलांच्या स्वयंपाकात वापरण्याचा अण्णांचा व वहिनींचा कटाक्ष असे. वापरून उरलेले नारळ विकत असत. मुले आळीपाळीने स्वयंपाक करीत असत. आठ दिवसांतून एकदा स्वयंपाकाची पाळी येत असे. आंब्याचे पिकही भरपूर येई. मुलांनी खाऊन उरलेले आंबे विकत असत. एक प्रचंड हापूस आंब्याचे झाड होते. त्या एका झाडाला सुमारे पाच ते सहा हजार फळे लागत. त्यापैकी काही आंबे व एक केळीचा घड 'अण्णा' न चुकाता महाराणी ताराबाई साहेबांना जल मंदिरात नेऊन देत. तेव्हा अण्णांचे बरोबर मी ही जात असे. त्यावेळी दत्तकपुत्र कै. शाहू महाराज, (अभयसिंह महाराज यांचे वडील) तेथे रहात असत मी त्यांचाबरोबर खेळायला जात असे.
वसतिगृहातील मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली व त्या बरोबर वहिनींच्यावर मुलांची देखरेखीची जबाबदारी पडू लागली. पण वहिनींना फारसे अवघड गेले नाही. कारण किर्लोस्करवाडीला व सातारारोडला असतांना त्यांना सामाजिक कामाची सवय झाली होती. त्या वसतिगृहातील मुलांची जाणीवपूर्वक देखरेख करू लागल्या. वहिनींनी कधीच कोणा मुलाला त्यांच्या जातीबद्दल विचारले नाही. मानव ही एकच जात त्यांनी अंत:करणात जोपासली होती असे मला सतत जाणवले.
वहिनी माहेरी फारशा जात नसत. मामा न्यायला येत पण वहिनी जात नसत. त्यांच्या आईचा निरोप येई तरीही त्या जात नसत. "महार, मांग, मुसलमान मुलांत तू राहतेस कशी?" असे माहेरी विचारत. म्हणून त्यांनी माहेरी जाणेच टाळले. पुढे पुढे सर्वसमावेशक अशी त्यांची वृत्तीच तयार झाली. स्वतःची मुले व वसतिगृहातील मुले असा भेद त्यांनी कधीच केला नाही.
एकदा मामा आले. मामांनी वहिनींना विचारले, "तुला काय आणायचे?" तेव्हा त्या म्हणाल्या, "मला काही नको. आप्पाला वूलनचे कोटाचे कापड व हाप पँटचे कापड आण आणि शकुंतलाला हातात काही नाही तिला सोन्याच्या बांगड्या आण." त्याप्रमाणे त्याने मला कापड व शकुंतलाला सोन्याच्या बांगड्या आणल्या. तोच पोषाख माझ्या फोटोत आहे.
वसतिगृहात वहिनी होत्या तेव्हा मुलांच्या कामाच्या पाळ्या मलाही लागत असत. मी एकत्र कुटुंबात राहिलो होतो. त्यामुळे मला वसतिगृहात मुलांच्या बरोबर एकत्र रहाणे काही नवीन वाटले नाही.
वहिनींची राहणी पहिल्यापासूनच साधी व सोज्वळ होती. तिने कधी फॅन्सी साड्यांचा हट्ट केला नाही की स्वतःसाठी कधी काही मागितले नाही. पडेल ते काम त्या निमुटपणे करीत. कधीच कोणत्या कामाचा कंटाळा म्हणून केला नाही. पडेल ते काम करावे व उरले तेही सावकाशीने करावे अशी त्यांची काम करण्याची पद्धती होती.
साध्या बारीक काठाच्या प्लेन रंगाच्या साड्यांत वहिनींचे सौभाग्य अगदी उठून दिसे. अण्णा कोल्हापूरहून छत्रपती शाहू मिलच्या अडीच रुपये किंमतीच्या एकदम डझनभर साड्या आणत. या साड्या सर्व रंगाच्या असत.
हाती घेतलेले काम वहिनी तत्परतेने यशस्वी करत. अण्णांच्या मागे हिमालयासारख्या त्या समर्थपणे व ठामपणे उभ्या राहिल्या. कोणत्याच गोष्टींची कधीच त्यांनी नापसंती दाखविली नाही. भारतीय स्त्रीचे आदर्श सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी सतत दिसून आले. वसतिगृहातील मुलांची संख्या वाढू लागली. राहाण्यासाठी झाडाखाली चिपाडांचेकूड घेऊन झोपडीत मातीची भर घालून माचं तयार करून मुले त्यावर झोपत असत. त्यामुळे सरपटणारे प्राणीही झोपडीत येणेस जागा नसे. मुले आपापल्या झोपड्यात निवांतपणे झोपू शकत असत. मुले भोजनगृहात जेवत असत. तीस झोपड्या होत्या. वहिनींना घरी काम करण्यासाठी येणारी मुले महार, मांग, मुसलमान समाजातील असत. आप्पालाल शेख, मुसलमान होता तर बनसोडे महार होता. ही मुले घर फार स्वच्छ ठेवत असत. आमचे घरांतील जेवण साधे भाजी-भाकरी असेच असे.
अण्णा गावाला गेले होते. वहिनी गरोदर होत्या. बाळंतपण कोठे करायचे याचा विचार चालला होता. आईला बोलविण्यास आप्पालाल शेख गेले होते. वहिनींच्या पोटात दुखायला लागले. म्हणून घरासमोर घोरपडेबाई म्हणून एक बाई रहात होत्या त्यांना वहिनींना दवाखान्यात न्यायला सांगितले. अण्णांचे एक स्नेही मिनियार शेठ होते. त्यांची अण्णांनी गाडी मागवली. वहिनींना गाडीत झोपवले. गाडी फक्त एक फुट गेली आणि पंक्चर झाली. घोरपडे बाई म्हणाल्या हे चिन्ह चागले नाही. जुन्या सिव्हील हॉस्पिटलला नेले. युरोपियन सर्जन होते. ऑपरेशन केले मुलगी झाली. दुपारी बारा-एकला बाळ-बाळंतीण दोन्हीही वारल्या. मी घरी होतो. वार्ता कळली पण जन्म मरणाचा काहीच अर्थ कळला नव्हता वहिनींची जीवनयात्रा संपली.
लोकजागृतीसाठी, शिक्षणप्रसारासाठी आणि संस्थेला मदत गोळा करण्यासाठी भाऊराव आयुष्यभर अनवाणी पायाने व उघड्या माथ्याने उन्हापावसातून हिंडत होते. त्यांच्या प्रकृतीवर याचा परिणाम जाणवू लागला. ते वरचेवर आजारी पडू लागले. संधीवात, रक्तदाब व हृदयविकार यांच्या उपचारासाठी त्यांना अनेकदा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हावे लगाले होते. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना मिळालेला विश्रांतीचा सल्ला त्यांनी कधीच पाळला नाही. बाहेर पडले की कार्यरत होऊन जात. सन १९५९ मध्ये उपाचारासाठी ते पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाले. यापूर्वी हृदयविकाराच्या अनेक झटक्यांतून ते सावरले होते. डॉक्टरांच्या अपेक्षेपेक्षा किमान दहा वर्षे ते अधिक जगले होते. केवळ इच्छाशक्तीच्या बळावर. ता.९ मे १९५९ रोजी हृदयविकाराचा झटका येऊन भाऊरावांचे पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये निधन झाले. निधनसमयी त्यांच्या मृत्युशय्येजवळ त्यांचा एक हरिजन विद्यार्थी होता.
© 2018 रयत शिक्षण संस्था,सातारा. सर्व अधिकार अधीन | डिझाईन आणि डेव्हलपमेंट (कर्मवीर विद्याप्रबोधिनी रयत शिक्षण संस्था,सातारा)